महायोगी श्री अरविंद
महान विभूती स्वतःच्या जीवनाला स्वकर्तृत्वाने आकार देऊन जगात भर घालतात की त्यांचे जीवन हे एका व्यापक योजनेचा निश्चित भाग असतो हा एक प्रश्न आहे. महायोगी श्री अरविंद यांच्या जीवनचरित्रावरून गोष्टी योजल्याप्रमाणे घडतात असे म्हणावे लागते. त्यांच्या जीवनातील २४ नोव्हेंबर १९२६ या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच दिवशी परमेश्वर संदेशाचे दिव्य अवतरण झाले अशी श्रद्धा आहे. हा दिवस 'सिद्धी दिन' म्हणून अरविंद आश्रमाच्या वतीने साजरा केला जातो. ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार ) १५ ऑगस्ट १८७२ ते ५ डिसेंबर १९५० असे ७८ वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेले श्री अरविंद यांचे जीवन म्हणजे विधात्याच्या योजनेनुसार वळत गेलेला पुण्यप्रद जीवनप्रवाह आहे. त्यांचे वडील डॉ. कृष्णधन घोष यांनी जाणीवपूर्वक अरविंद आणि त्यांच्या भावडांना भारतीय सनातन धर्म, संस्कृती, विचार यांच्याशी कोणताही संपर्क येऊ नये म्हणून इंग्लंडमध्ये रेव्हरंड यांच्या घरी ठेवले तरीही अरविंद अंत:करणात देशभक्ती उफाळून आली कारण 'झरा मूळ...