स्वामी विवेकानंद - शेवटचे दिवस

 


                                                                    ( स्वामी विवेकानंद )

४ जुलै १९०२ या दिवशी स्वामी विवेकानंदांचे निधन झाले. महान व्यक्तिंना त्यांच्या निधनाची पूर्वकल्पना असते असे वाटते. महाभारतामध्ये भीष्माचार्यांची गोष्ट आहे. त्यांना इच्छामरणाचा वर मिळाला होता.त्याप्रमाणे त्यांनी आपल्या मृत्यूचा दिवसही निश्चित केला होता. अनेक महान व्यक्तींबद्दल असे म्हणता येते.स्वामी विवेकानंदांना आपला निधनाचा दिनांक ४ जुलै असावा असे वाटत होते. त्या महिन्याच्या दिनदर्शिकेवर ४जुलैच्या दिनांकावर त्यांनी खूण करून ठेवली होती. दोन दिवस आधी त्यांच्या शिष्या भगिनी निवेदिता त्यांना भेटायला आल्या. स्वामीजींनी त्यांच्याशी वार्तालाप केला. त्यांना प्रेमाने जेवू घातले. जेवण झाल्यानंतर स्वामीजींनी भगिनी निवेदितांच्या हातावर पाणी घातले. त्यांचे हात स्वतः पुसून कोरडे केले. स्वामीजींनी यापूर्वी असे कधीच केले नव्हते. तेव्हा भगिनी निवेदिता संकोचल्या.त्यांनी स्वामीजींना विचारले, "स्वामीजी आपण काय करता आहात?" स्वामीजी म्हणाले, " येशू ख्रिस्ताने नाही का त्याच्या शिष्यांचे पाय धुतले होते." निवेदितांच्या मनामध्ये येऊन गेले , " ते त्याच्या आयुष्यातील अखेरचे जेवण होते." पण त्या काहीच बोलल्या नाहीत.दोनच दिवसानंतर ज्यावेळी स्वामीजींच्या निधनाची बातमी कळाली तेव्हा भगिनी निवेदिता यांना या प्रसंगाची संगती लागली. तसेच अन्य शिष्यांनाही स्वामीजींनी ४ जुलैच्या दिनांकावर का खूण केली हे लक्षात आले.


                                                                        ( भगिनी निवेदिता )

स्वामीजींचा निष्प्राण देह अंत्यदर्शनासाठी ठेवला होता. भगिनी निवेदितांनी अत्यंत दुःखी अंतःकरणाने स्वामीजींचे अखेरचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या मनात येऊन गेले की स्वामीजींच्या देहावर जे वस्त्र पांघरले आहे त्याचा एक तुकडा आठवण म्हणून स्वामीजींच्या दुसऱ्या एक शिष्या जोसेफाइन मॅकलाऊड यांना देण्यासाठी मिळावा. पण गडबडीत ते राहून गेले. नंतर स्वामीजींचा देह चितेवरती ठेवण्यात आला आणि त्या चितेला अग्नी देण्यात आला. भगिनी निवेदिता अन्य शिष्यपरिवारासोबत जवळच होत्या. अचानक त्यांना आपल्या बाहीला ओढ बसली असं वाटलं. चितेतून एक तुकडा उडून त्यांच्या मांडीवर पडला.त्यांनी बघितले. त्यावेळेला त्यांच्या लक्षात आले स्वामीजींच्या देहावर जे वस्त्र पांघरले होते त्याचाच एक छोटासा तुकडा येऊन पडला होता. अत्यंत भावविभोर अंतःकरणाने भगिनी निवेदितांनी तो तुकडा उचलला आणि आपल्या गुरूंचे शब्द त्यांना आठवले, " मी तुझ्याबरोबर राहीन." भगिनी निवेदितांना उर्वरित आयुष्यात सदैव हीच जाणीव होत राहिली की स्वामीजी नेहमी त्यांच्या सोबत आहेत.
आपल्या शिष्येला विलक्षण रीतीने सांभाळणारे धन्य ते स्वामी विवेकानंद आणि आपल्या गुरूंच्या पायाशी नतमस्तक झालेल्या धन्य त्या भगिनी निवेदिता. दोघांनाही विनम्र अभिवादन.
संदर्भ :- स्वामी विवेकानंद यांचे चरित्र ले.प्रा.एस. एन. धर अनुवाद सुरूची पांडे


Comments

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख