बालपणाचा एक तुकडा
मोठं झाल्यावर माणसाचं सगळ्यात जास्त काय नुकसान होतं तर ते म्हणजे बालपण संपतं. काहीही केलं तरी ते परत येत नाही. माझ्या दृष्टीने बालपणीचा सुखाचा काळ म्हणजे खेळ, मौजमजा, अभ्यास, संघाची शाखा, सणवार, घरातील वेगवेगळी कार्यं, शाळा , अभ्यास आणि माझ्याबाबतीत महत्त्वाचं म्हणजे वाचन! आमची आई ती.गं.भा.नंदा हिच्याकडून वाचनाची आवड अनुवांशिकतेने माझ्यात उतरली आहे. (छायाचित्रात आई श्रीमती नंदा गाडे, श्री वसंत भगत गुरुजी आणि मी) यात वाचनाच्या बाबतीत महत्त्वाची गोष्ट म्हणजे साखरवाडीच्या रविवारच्या आठवडी बाजाराच्या दिवशी आमच्या कै. ती.बापुंच्या दुकानासमोरचं 'भगत गुरुजींचं पुस्तक आणि फोटो विक्रीचं दुकान'. रविवारी सकाळी १० च्या सुमारास सायकलवर उंचपुरे, गोरे, पांढरा सदरा धोतर आणि गांधीटोपी घातलेले, कपाळावर बुक्का लावलेले 'वसंत भगत गुरुजी' सायकलवरुन येत असत. सायकलवर दोन्हीकडे मोठ्या पिशव्या, मागे कॅरियरवर गठ्ठा असं घेऊन आलेल्या गुरुजींचं दुकान थाटलं जाण्याची मी वाटच पाहत असे. कधी एकदा त्यांचं दुकान मांडलं जातंय असं मला होत असे. त्यांचं...