दोन अभिनेत्रींच्या सासवांचे ऋण
सामान्य माणसाच्या आयुष्यात बदलाचे काही टप्पे ठरलेले असतात. शिक्षण, नोकरी किंवा व्यवसाय आणि लग्न. आपल्या देशात बहुतेक ठिकाणी पुरुष प्रधान संस्कृती आहे. त्यामुळे स्त्रीच्या आयुष्यातील लग्न हा टप्पा विशेष महत्त्वाचा ठरतो. कारण लग्नानंतर तिला आपले घरदार सोडून पतीच्या घरी जावे लागते. लग्नाच्या नात्याने अनेक नवीन माणसे जोडली जातात. त्यापैकी एक नातं हे सासू आणि सुनेचं आहे. सासू सुनेचे नातं हा एक नाजूक, गुंतागुंतीचा विषय आहे. बहिणाबाई चौधरी यांच्यासारख्या जीवन आकळलेल्या कवयित्री म्हणतात ऐक ऐक रे योग्या काय मी सांगते लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. सासुरवासाने त्रासलेल्या मुलीचा चार दिवस माहेरी सुखाचा अनुभव यावा यासाठी तिची आई सासुरवास सोसत राहते असे बहिणाबाई सुचवतात. याचबरोबर काहीजण गंमतीने सासू म्हणजे सारख्या सूचना आणि सून म्हणजे सूचना नकोत अशाप्रकारे सांगताना दिसतात. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात सासरी छळ होऊन मरण पावलेल्या किंवा आत्मह...