धन्यवाद किती आवश्यक?

 " धन्यवाद सुधीर!" काही महिन्यांपूर्वी एका कार्यकर्ता मित्राने मला फोनवर म्हणाला. फोन बंद झाला. मी लगेच त्याला परत फोन केला आणि म्हणालो, " धन्यवाद देण्याची आवश्यकता नाही. जे बोलणं झालं ते आपल्या कामाबद्दलच आहे." मग त्याला‌ थोडेसं (!) पटलं.


   गेल्या काही वर्षांत धन्यवाद देण्याचं प्रमाण वाढलं आहे असे माझे निरीक्षण आहे. जिथे औपचारिकता आहे, अनोळखी व्यक्तिंनी केलेली मदत आहे तिथे धन्यवाद देणे योग्य आहे.‌ पण जिथे जिव्हाळ्याचे, नात्यांचे संबंध आहे तिथे अशा औपचारिकतेची गरज नाही असे वाटते. 

     अशाप्रकारे उठसूट धन्यवाद देण्यामुळे आपल्या मूल्यव्यवस्थेवर हळूहळू परिणाम होतो आहे. कारण आता काही घरांतही मुलाने किंवा मुलीने अगदी छोटंसं काम केले की धन्यवाद द्यायचे प्रमाण वाढत चाललं आहे असे माझे निरीक्षण आहे. उदाहरणार्थ आई किंवा वडिलांना तहान लागली असेल आणि मुलाने किंवा मुलीने पाणी आणून दिले तर लगेच पालक 'थँक्यू' म्हणतात. परंपरेने आपल्याकडे कर्तव्याला जास्त महत्त्व दिले आहे. आई-वडिलांची सेवा करणे हे मुलामुलींचे कर्तव्य मानले गेले. ज्यावेळी अशाप्रकारे धन्यवाद दिले जातात त्यावेळी कळत नकळत हे नाते औपचारिक वळणावर जाऊ लागते. यामुळे कुटुंबभावना क्षीण होऊ लागते. पश्चिमेकडून आलेला अशा प्रकारचा हा औपचारिकपणा वाढत गेल्याने वेगळे प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यातून मग प्रत्यक्ष जन्मदात्या आईवडिलांनाही औपचारिकपणे वेळ ठरवून भेटायला जाणे, न ठरवता भेटलं तर त्यात चूक आहे असे वाटणे, त्यातून नातेसंबंधात कोरडेपणा येणे,  आईवडील आणि मुलेमुली संपूर्णपणे स्वतंत्र आणि एकमेकांची काहीही जबाबदारी नसलेले आहेत असे वाटणे ह्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे यादिशेने जाणे टाळायचे असेल तर अनौपचारिक संबंधांमध्ये धन्यवाद देण्याची आवश्यकता नाही असे मला वाटते.

     २००६ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक पू.श्रीगुरूजी यांच्या जन्म शताब्दी निमित्त पुण्यामध्ये श्री गुरु मूर्ती यांचे भाषण मला ऐकायला मिळाले होते. त्यात ते ते म्हणाले होते,    " India has ancient privatisation of social security system, which is called as family." कुटुंबामध्ये मुलामुलींची काळजी घेऊन त्यांचे पालन-पोषण करणे हे आई वडिलांचे कर्तव्य मानले गेले आहे.‌ तर आई-वडील वृद्ध झाल्यानंतर त्यांची काळजी घेणे हे मुलामुलींचे कर्तव्य मानले गेले आहे. त्यामुळे सरकारला याविषयात कोणताही निधी द्यावा लागत नाही. पण अनेक पाश्चात्य देशांमध्ये १८ वर्षांवरील नागरिकांच्या उपजीविकेची व्यवस्था करणे म्हणजे सोशल सिक्युरिटी सिस्टीम हे सरकारचे काम मानले गेले आहे. त्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणावर निधी द्यावा लागतो. 

    मग प्रश्न येतो की धन्यवाद द्यायचे नाहीत तर काय करायचे. अशा वेळी वेगळ्या प्रकारे ती भावना व्यक्त करता येऊ शकते. आधी दिलेल्या उदाहरणात मुलामुलीने पाणी आणून दिले तर त्यांना 'शाब्बास', 'चांगले केलेस' असे म्हणू शकतो. मित्रांसोबत बोलताना 'तुझ्यामुळे काम झालं बघ' ,'बरं झालं' असं अनौपचारिकपणे म्हणता येऊ शकतं. यातून कर्तव्यबोध जागृत राहिल आणि मूल्यव्यवस्थेला धक्का लागणार नाही असे वाटते. ही मूल्यव्यवस्था, आयुष्याबद्दलचा दृष्टिकोन तसाच पुढे चालू ठेवणे आपले सर्वांचे काम आहे असे वाटते.


सुधीर गाडे,  पुणे

Comments

  1. सद्यस्थितीत अति आवश्यक असं जीवनमूल्य आहे हे,
    👍👍👌👌

    ReplyDelete
  2. जो अनोळखी वा परका तो धन्यवादास पात्र मानावा;
    तसंच ज्याला धन्यवाद दिले तो अनोळखी वा परका समजावा.

    ReplyDelete
  3. फारच छान सर, आणि अश्या मुळे नात्यातही औपचारिकपणा येऊ लागला आहे.

    ReplyDelete
  4. अगदी खरं लिहिले आहे. अनेक वेळा धन्यवादाच्या औपचारिक ओझ्याखाली व्यक्ती मधला आपलेपणा अदृश्य होऊ लागतो.

    ReplyDelete
  5. छान लेख. विचार करायला हवा असा विषय.

    ReplyDelete
  6. सुंदर विवेचन सर 🙏

    ReplyDelete
  7. वा !! गोष्ट छोटीशीच पण बरंच काही सांगणारी ...

    ReplyDelete
  8. खरोखर आचरणात आणणे आवश्यक असल्याचे जाणवते हल्लीच्या परिस्थितीत. छान लिहिले आहे तुम्ही.

    ReplyDelete
  9. खूपच सुंदर लेख मूळ संस्कृतीकडे घेऊन जाणारा

    ReplyDelete
  10. अगदी बरोबर आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख