Posts

Showing posts from September, 2024

संवादातील सहजपणा

Image
     माणसाचा अभिमान ही तशी स्वाभाविक म्हणावी अशी गोष्ट आहे. याचे कारण प्रत्येक माणूस हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असते. एका अर्थाने प्रत्येक जण हा 'एकमेवाद्वितीय' असतो. यामुळेच की काय स्वतःच्या दिसण्याचा, ज्ञानाचा, संपत्तीचा, पदाचा, सत्तेचा अभिमान माणसांमध्ये सहजपणे तयार होतो.  हा तयार झालेला अभिमान कळत नकळत अहंकारामध्ये रूपांतरित होतो. जवळ असलेल्या गुणवैशिष्ट्यांमुळे इतरांच्यापेक्षा आपण कोणीतरी खूप वेगळे आहोत अशी भावना माणसांच्या मनात निर्माण होते आणि त्यातून स्वतःच्या वरचढपणाचा अहंकार तयार होतो. असा वरचढपणा अंगात भिनला की मग काहीजणांना सर्वांशी बरोबरीच्या भूमिकेतून संवाद करणे शक्य होत नाही. त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे संवाद ऐकू येतात. या संवादातून बहुदा बरेच जळ स्वतःचा वेगळेपणा ठसवत असतात किंवा ठसवण्याचा प्रयत्न करत असतो.     ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )      याला अपवाद असणारी मोठी माणसे आपला मोठेपणा सहजपणे विसरून इतरांच्यामध्ये मिसळून जातात. काही वर्षांपूर्वी एआरडीइ या संरक्षण खात्याच्या संशोधन संस्थेतून संचालक म्हणून निवृत्त झालेले ज्येष्ठ शास्त्रज्ञ श्री. काशिनाथ देवधर या

विश्वबंधुत्व दिन

Image
     ११ सप्टेंबर १८९३ या दिनांकाने इतिहासात आपली नोंद अजरामर करून ठेवली आहे. याच दिवशी अमेरिकेत शिकागो येथे भरलेल्या सर्वधर्मपरिषदेच्या उद्घाटन प्रसंगी स्वामी विवेकानंद यांनी उच्चारलेल्या , "अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो!" या शब्दांनी उपस्थित हजारो श्रोत्यांच्या हृदयाची तार छेडली गेली, नसानसातून विद्युत संचार झाला, मनाची स्पंदने जुळली. या परिषदेच्या एक दिवस आधी आगगाडीच्या डब्यामध्ये अनामिकपणे रात्र घालवलेल्या स्वामीजींवर जणू प्रसिद्धीचा प्रखर झोत पडला. स्वामीजींच्या या शब्दांचा प्रभाव इतका का पडला? याचे कारण स्वामीजींचे शब्द हे मनापासून उच्चारलेले होते. जे पोटामध्ये होते तेच ओठांवर आले.‌ स्वामीजींनी अन्य एके ठिकाणी म्हटले आहे, " शब्दांचा प्रभाव हा एक तृतीयांश असतो तर व्यक्तिमत्त्वचा प्रभाव दोन तृतीयांश असतो. " स्वामीजी उदार, व्यापक व्यक्तिमत्त्व असल्यानेच शब्दांचा हा विलक्षण प्रभाव पडला. ( जागतिक सर्वधर्मपरिषदेचे छायाचित्र इंटरनेटवरून साभार )         स्वामी विवेकानंद यांच्या या छोट्याशा भाषणात साधारणपणे पाच मुद्दे होते. पहिला म्हणजे स्वागताबद्दल कृतज्ञता आण

स्त्री सन्मान राखण्यासाठी

Image
        गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात विविध ठिकाणी घडलेल्या मुली महिला यांच्यावरील अत्याचारांच्या बातम्या सातत्याने वाचायला मिळत आहेत. या बातम्या वाचून दुःख होते. वेदना होतात. सात्विक संतापदेखील उत्पन्न होतो. या बातम्यांमध्ये पश्चिम बंगालमधील डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्याची बातमी किंवा बदलापूर येथील शाळेतील अगदी लहान वयातील मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची बातमी केरळमध्ये चित्रपटसृष्टीत महिलांचे पद्धतशीरपणे लैंगिक शोषण करण्याची यंत्रणा चालते असे निरीक्षण नोंदवणारा न्यायमूर्ती के. हेमा यांचा अहवाल अशा अनेक बातम्या आहेत.     ( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )        अशा घटना घडल्या की काही प्रमाणात त्या झाकून ठेवण्याकडे कल असतो. कारण साधारणपणे आपल्याकडे अत्याचार करणाऱ्या पुरुषांपेक्षा जिच्यावर अत्याचार झाला आहे अशा स्त्रीची जास्त बदनामी झाली असे मानले जाते. तिला पुढील आयुष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. काही सर्वेक्षणात तर जवळच्या नात्यातील पुरुषांनीच अत्याचार केला दिसून आले आहे. अशा घटनांमध्ये तर व्यक्त होणे, तक्रार करणे हा जणू अपराध मानला जातो