Posts

Showing posts from May, 2022

विसरणारा मी

Image
  मध्यंतरी एका कार्यक्रमात एका वकिलांची भेट झाली. मी त्यांना माझी ओळख करून दिली. तेव्हा ते म्हणाले, ' मी तुमच्या घरी येऊन गेलो आहे.' पण मला काही आठवले नाही. नंतर त्यांनी तपशील सांगितल्यावर मला लक्षात आले.     माझ्याबाबतीत असे हल्ली तर बरेचवेळा होते. मला माणसांची नावे, तपशील विसरायला होतो. गेल्या काही वर्षांत तर हे प्रमाण अधिक वाढले आहे. माझ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना मी बऱ्याच वेळा गंमतीने म्हणतो, 'माझी मेमरी व्होलटाइल आहे.  ( संगणकातील तात्पुरत्या माहितीच्या साठ्याला व्होलटाइल मेमरी म्हणतात.) नाव परत विचारले तर रागावू नका.' एकदा  तर बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला मी म्हटले, ' अरे तास आहे आत्ता.' तो म्हणाला, 'सर, मी बारावी झालो आता.' बऱ्याच वेळा मी नावे विसरतो,‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ एकाच्या नावाने दुसऱ्या विद्यार्थ्याला हाक मारतो. अशीही गडबड होते. तरी हजेरी घेऊन मी नावांची उजळणी करत असतो.      शाळा , महाविद्यालयातील सोबती, गावचे लोक,  संघाचे वेगवेगळ्या ठिकाणी सोबत काम केलेले, करणारे स्वयंसेवक यांचीही नावे तपशील विसरायला होतो

संमिश्र लेखन

Image
 (९/०३/१९९५ रोजी लिहिलेले स्फुट)     परिस्थिती बदलायला किती वेळ लागतो? कधी कधी तर काही क्षणात ती इतकी बदलते की थोडा वेळ काही सुचत नाही. आणि सुचलं तर नीट जमत नाही. पण कधी कधी परिस्थिती बदलायला इतका वेळ लागतो की छोट्या छोट्या बदलांसाठीसुद्धा खूप वाट पहावी लागते. वाट‌ पहाता पहाता जेव्हा परिस्थिती खरीच बदलते तेव्हा मात्र तोपर्यंत रचलेले मनाचे मनोरे ढासळतात. हे मनोरे इतके रचले गेलेले असतात की कल्पनेच्या भरारीने भविष्यातला रस‌ इतका शोषून घेतला असतो की वर्तमानात आल्यावर तो चोथ्यासारखा भासतो. (११/०३/१९९५ रोजी लिहिलेले स्फुट)      माणसाची विचारसरणी किती मर्यादित असते. ती बनते कशी? माणूस ज्या परिस्थितीत वावरतो त्यावरून त्याच्या विचारसरणीची मर्यादा ठरते. परिस्थिती व्यक्तिगत स्वरूपाची तर असतेच. त्यामुळे विचारसरणीला व्यक्तिगत दृष्टिकोन मिळतो. पण माणूस जर राष्ट्रीय/बौद्धिक पातळीवर जगत असेल तर विचारसरणी सुद्धा तशीच होणार. (११/७/१९९५ रोजी लिहिलेले स्फुट)     सवय नेमकी कशाची होईल काही सांगता येत नाही. तशी सवय कशाचीही होऊ शकते. एखादी अप्रिय व्यक्ती बरोबर असण्याचीही सवय होते नि प्रिय व्यक्ती दूर गेल्याची

वाट

Image
         (८/०३/१९९५ रोजी लिहिलेले स्फुट)    'वाट पहाणं ' हे एक परीक्षा बघणारे काम आहे. कशाच्यातरी वाटेकडे डोळे लागले असतील हातात असलेलं काम नीट पार पडत नाही. मन कावरंबावरं होऊन जातं नि काय करू आणि काय नको असं होऊन जातं. वाट पहाता पहाता बराच काळ निघून जातो नि बहुधा शेवटी थोडक्यासाठी धीर सुटतो आणि घोटाळा होतो.     'वाट चालणं' हे तर माणसाच्या पाचवीला पुजलेलं आहे.‌कधी कधी वाट चालता आडवाटेचा मोह पडतो नि माणूस राजरस्ता सोडून जंगलात भटकतो. बहुधा आडवाटा माणसाच्या संयमाचा कस पाहतात. तो थोडा जरी सुटला तरी त्या माणसाला रानभैरी करून टाकतात. त्यामुळं वाट चालताना ती ' वाट बिकट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडू नको' असा चपखल उपदेश ध्यानात ठेवायला हवा. भले थोडा उशीर झाला तरी चालेल पण मुक्कामावर पोचण्याची तर खात्री आहे.  ( १३/०५/२०२२ रोजी लिहिलेले स्फुट)    ' वाट‌ लावणे ' हा शब्द प्रयोग आता बऱ्यापैकी सर्वपरिचित आहे.‌ काही जण स्वत:च्या वागण्याने स्वतःची वाट लावतात. तर काही जण शत्रुत्व, असूया, आकस यामुळे दुसऱ्याची वाट लावण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्याची वाट लावण्यात काही लोक ल

जवळचे संबंध

Image
             (२/०३/१९९५ रोजी लिहिलेले स्फुट)        ' एखादी गोष्ट तुमची आहे की नाही याची खात्री करायची असेल तर ती सोडून द्या. ती जर परत आली तर ती तुमची आहे. ती जर परत आली नाही तर ती तुमची कधीच नव्हती.' माणसांच्या बाबतीतही ही गोष्ट सहजच लागू पडेल. पण माणसांशी संबंध जोडत असताना आपले संबंध नक्की किती जवळ आले आहेत याचा अंदाज येतो अवघड आहे. आपण एखाद्याला आपल्या जवळचा समजून काही गोष्ट विचारली तर त्याचं उत्तर येत नाही. मग आपल्या लक्षात येतं ' अरेच्चा आपण समजत होतो इतके काही आपले संबंध जवळचे नाहीत तर.' मग असलेला दुरावा जास्तच जाणवू लागतो आणि त्या व्यक्तिशी आपल्याला जवळचे संबंध ठेवायचे असतील तर जास्तच बोचू लागतो.      (९/०५/२०२२ रोजी लिहिलेले स्फुट)        साधारणपणे माणसाला समूहाने रहायला आवडते. त्यामुळे शेजारीपाजारी, नातेवाईक, मित्रमंडळी, सहकारी अशा वेगवेगळ्या समूहात माणूस रमतो. असे समूह भावना, मदत , विचार यांच्या देवाणघेवाणीतून तयार होतात. परस्पर सहकार्य करत असताना त्यातून बरेच वेळा निरपेक्ष प्रेम विकसित होते. आपल्या जवळच्या व्यक्तिला चांगले वाटावे, तिला आवडते केवळ यांसारख्या

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची पूर्वतयारी

Image
          आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० स्वीकारले आहे. क्रमाक्रमाने या धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. भारतकेंद्री शिक्षण,  कप्पेबंद पद्धती मोडून लवचिक पद्धतीने होऊ शकणारे शिक्षण ही या धोरणाची काही वैशिष्ट्ये आहेत. ऐतिहासिक आणि प्रागैतिहासिक काळात भारताने ज्ञानाच्या विविध क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती केली होती. परंतु याची पुरेशी माहिती विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमातून मिळत नव्हती. या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात ही त्रुटी दूर करण्याची योजना करण्यात आली आहे. प्राचीन काळी आपल्या पूर्वजांनी केलेल्या प्रगतीचे पुरावे आजदेखील पाहता येतात. उदा. गेली सुमारे दीड हजार वर्षे न गंजता उभा असलेला दिल्लीतील विष्णुस्तंभ. गणित, खगोलशास्त्र, आयुर्वेद या विषयांमध्ये आर्यभट्ट, भास्कराचार्य, वराहमिहीर , सुश्रुत, चरक यांसारख्या विद्वानांचे योगदान तर सर्वमान्य आहे. या भारतकेंद्री धोरणाला प्रतिसाद देत आपण जागरूकपणे आपल्या देशातील प्राचीन प्रगतीची माहिती घ्यायला सुरूवात केली पाहिजे. यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न वैयक्तिक तसेच सामूहिक स्तरावर करता येतील. अशा प्राचीन, ऐतिहासिक स्थळांना भेट, विविध पुस्तका